प्रतिनिधी – अतुल काळे
- 45 वर्षाची दहीहंडीची परंपरा
- ‘गोविंदात’ उत्साहाचे वातावरण
सांगली/तासगांव : येथील श्रीकृष्ण मित्र मंडळ, ढवळवेस आयोजित दहिहंडी उत्सवाचे ४५ वे वर्ष असून सांगली जिल्ह्यातील पहिली दहीहंडीचे आयोजन करणारे मंडळ आहे. मुंबईनंतर दहिहंडी उत्सव सांगली जिल्ह्यात आणण्याचे श्रेय श्रीकृष्ण मित्र मंडळाला जाते.
यावेळी “राधाकृष्ण, गोपाल कृष्ण” च्या गजरात बालगोविंदाच्या डोक्यावरून मैदानात आणली. तासगांव नगर परिषदेचे प्रशासक मा. पृथ्वीराज पाटील यांच्या शुभहस्ते दहीहंडीचे पूजन करून ती उंचावर बांधण्यात आली. शिवनेरी गोविंदा पथकाने ध्येयमंत्र म्हणल्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ७ थरांचा मनोरा करून त्यांनी उंचीचा अंदाज घेतला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडली.
गेली ४५ वर्षे सलग सुरु असलेल्या दहिहंडी उत्सवाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण मित्र मंडळाचे जेष्ठ सदस्य प्रताप माळी, संजय सुतार आणि विराज सुतार यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. गेल्या 40 वर्षाची परंपरा सांभाळत रामकृष्ण काळे मामा यांच्यावतीने यावर्षी देखील रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. तसेच कै. जयवंत संजय सुतार याच्या स्मरणार्थ कुटुंबियांकडून गोविंदा पथकास बक्षिस देण्यात आले. दहीहंडी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सुतार यांनी केले असून दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी तासगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.