प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : नवीन पोलीस ठाणे निर्मिती संदर्भातील महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या मार्गदर्शक तत्वामधील शर्थी व अटीमध्ये सावळज पोलीस ठाणे समाविष्ट होत असून यापूर्वी रद्द करण्यात आलेला सावळज पोलीस ठाणे प्रस्ताव नव्याने करुन गृह विभागाने अंतिम मंजुरी द्यावी. या मागणीसाठी दि.15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या मुंबई येथील सागर बंगल्या समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले की, तासगाव तालुक्यात एकच पोलीस ठाणे आहे.तालुक्यातील 69 गावांतील कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेंव्हा तासगाव पोलीस ठाणेवरील कामाचा ताण कमी करणे व सावळज पूर्व भागातील नागरिकाच्या सोयीच्या दृष्टीने तत्कालीन डी.वाय.एस.पी.कृष्णात पिंगळे यांनी सावळज पोलीस ठाणे प्रस्ताव पोलीस महासंचालकाकडे पाठविला होता.परंतु सावळज पोलीस दुरक्षेत्रामध्ये गुन्ह्यांची सरासरी 48 पेक्षा कमी असलायचे जुजबी कारण दाखवत सदर प्रस्ताव 2016 मध्येच रद्द केला आहे.परिणामी सावळज पोलीस ठाण्याच्या आशा संपुष्टात आल्या.
दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र शासन गृह विभागाने राज्यात नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी विचारात घ्यावयाची मार्गदर्शक तत्वे व त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याचे परिपत्रक जाहीर केले आहे.शासन निर्णय क्रमांक : अपीओ-3622/प्र.क्र.104(2)/पोल-3 मधील नवीन पोलीस ठाणे निर्मिती संदर्भातील मार्गदर्शक तत्वानुसार सावळज पोलीस दूर क्षेत्राचे सावळज पोलीस ठाण्यात रूपांतर करणे शक्य आहे. याबाबत 2015 पासून वारंवार पाठपुरावा करूनही सावळज पोलीस ठाण्यासाठी मंजुरी मिळत नाही.तेंव्हा नवीन सावळज पोलीस ठाणे निर्मिती प्रस्ताव करून त्याला अंतरीम मंजुरी द्यावी.या मागणीसाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 15 ऑगस्टपासून सागर बंगल्या समोर दलित महासंघाचे वतीने आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार म्हंटले आहे